“भारतीय स्त्रियांचा त्याग जगात महान!” – शंकरराव गायकर

0
199

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – “भारतीय स्त्रियांचा त्याग जगात महान आहे!” असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्रीय मंत्री शंकरराव गायकर यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे येथे गुरुवारी, (दि.१२) काढले. विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिनांक ०४ मे ते ११ मे २०२२ या कालावधीत दुर्गावाहिनीच्या माध्यमातून भारतीय युवतींना सुसंस्कारित आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी शंकरराव गायकर यांनी मार्गदर्शन केले.

कर्नावती क्षेत्र दुर्गावाहिनी संयोजिका डॉ. यज्ञा जोशी, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत उपाध्यक्ष माधुरी सौंची, प्रांत मंत्री संजय मुरदाळे, प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. दिनांक ०४ मे रोजी प्रशिक्षणार्थी युवतींचे एकत्रिकरण करण्यात आले. दिनांक ०५ मे रोजी सकाळी मीना भट यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मीना भट यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना आणि उद्दिष्टे याविषयीची माहिती दिली. दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक, चर्चा आणि कृती अशा विविध सत्रांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीं युवतींना प्रशिक्षण देण्यात आले. दररोज पहाटे साडेचार वाजेपासून ते रात्री सव्वादहा वाजेपर्यंत विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना प्रबोधन करण्यात आले. पहाटे प्रात:स्मरणात श्लोक, रामनामाचा जप, दिनविशेष, प्रेरक कथा आणि पंचांग सांगितले गेले. शारीरिक सत्रांच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी दोन तास दंड, रायफल नेमबाजी, नियुद्ध, योग, बाधा ,ढोल, समता इत्यादींचे प्रशिक्षण दिले गेले. बौद्धिक सत्राच्या माध्यमातून विविध मान्यवर तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यांमध्ये अमृता नळकांडे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गावाहिनी संयोजिका) यांनी दुर्गवाहिनीची स्थापना आणि उद्दिष्टे याविषयीची माहिती दिली, तर भार्गव सरपोतदार यांनी सामाजिक समरसता तसेच विनायक देशपांडे (केंद्रीय महामंत्री विश्व हिंदू परिषद) यांनी भारताचा गौरवशाली इतिहास कथन केला. प्रज्ञा महाला (अखिल भारतीय दुर्गावाहिनी संयोजिका) यांनी कुटुंबप्रबोधनाविषयी मार्गदर्शन केले. दिनांक १० मे रोजी डॉ. यज्ञा जोशी यांनी राष्ट्रीय सुरक्षेमध्ये महिलांचे योगदान आणि रामजन्मभूमीची सद्य:स्थिती या विषयावर माहिती दिली.
चर्चासत्रांमध्ये ‘हमारी प्रार्थना’ , ‘गोरक्षा’ , ‘हिंदू घर’ , ‘छोटे छोटे सेवाकार्य’ , ‘सोशल मीडिया’ , ‘महिला व कायदे’ अशा विविध विषयांवर किशोरी कोळेकर, सुनीता देशमुख, भगवती माने, अरुणा माने, रेवती हणमसागर, संजय कुलकर्णी, गणेश मांजरे, ॲड. प्रशांत यादव या संबंधित विषयातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

समारोप प्रसंगी शंकरराव गायकर पुढे म्हणाले की, “रामायण काळात सीता, ऊर्मिला यांचा त्याग अद्वितीय होता. ती परंपरा रजपूत स्त्रियांनी पुढे चालवली. क्रांतिकारक भगतसिंग यांची माता विद्यादेवी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबातील महिलांपासून असंख्य ज्ञात-अज्ञात महिलांनी कौटुंबिक पातळीवर केलेल्या त्यागामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला. दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून युवतींना आपल्या मनगटातील बळाची अन् मनाच्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे!”

यावेळी समता, दंड, नियुद्ध, तलवार रायफल, योगा, रोप योगा, सूर्यनमस्कार, ढोल पथक इत्यादी प्रात्यक्षिके दुर्गांनी करून दाखविले.
वर्गासाठी अनंता शिंदे, राजेश जाधव, तुषार कुलकर्णी, चंद्रकांत कदम, बौद्धिक व्यवस्थाप्रमुख प्रिया रसाळ, भगवती रायते, अर्चना रानडे, प्रज्ञा सावंत, दत्ताराम रामदासी यांनी नियोजन केले.