Videsh

भारताने युद्ध लादले तर आम्ही शेवट करु; पाकिस्तानची पुन्हा पोकळी धमकी

By PCB Author

August 26, 2019

इस्लामाबाद, दि. २६ (पीसीबी) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारणासंबंधीच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी भारताला पुन्हा एकदा युद्धाचा पोकळ राग दिला आहे. भारताने आमच्यावर युद्ध लादले तर पाकिस्तान त्याचा शेवट करेल असे फिरदौस आशिक अवान यांनी म्हटले आहे. 

काहीही झाले तरी पाकिस्तान युद्ध पुकारणार नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणार नाही. पण युद्धासारखी स्थिती निर्माण झाली तर प्रत्येक पाकिस्तानी आपल्या सैन्यासोबत लढेल असे फिरदौस आशिक अवान राज्यपाल भवनात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अलीकडेच पोखरणला गेले होते. भारताने १९९८ साली पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी केली. भारताला अण्वस्त्र संपन्न देश बनवण्याचे अटलजींचे स्वप्न होते. पहिला अण्वस्त्राचा वापर न करण्याचे भारताचे धोरण असून आजही आम्ही त्यावर कायम आहोत. पण भविष्यात काय घडेल ते परिस्थितीवर अवलंबून असेल असे टिे्वट राजनाथ यांनी केले होते. भारताच्या संरक्षण मंत्र्यांच्या या टि्वटनंतर पाकिस्तानात अनेकांच्या भुवया उंचावल्या. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत.