“भारतात रोज २५०० ते ३००० हिंदूंचे धर्मांतर” – केंद्र सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा !

0
336

– महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

पुणे, दि. २५ (पीसीबी) – ‘सनातन धर्म’ एक महान धर्म आहे आणि याचा कुठलाही पर्याय या जगात नाही. याच आपल्या धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच या देशाला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर हे अवैध ठरवले जावे, अशी मागणी इंदौर येथील श्री अखंडानंद आदिवासी गुरूकुल आश्रमाचे महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रव्यापी धर्मांतर बंदी कायदा आणावा ! या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

स्वामी प्रणवानंद सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले, ‘आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत. आपली संस्कृती, वैज्ञानिक संपदा, भौतिक शक्ती आपल्या ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. फक्त धर्मांतरापुरता हा विषय नसून पूर्ण भारताला आपल्या अधीन करण्याचे हे षडयंत्र आहे. आपले पूर्वज अत्यंत धर्मनिष्ठ होते. कितीही आक्रमणे झाली तरी त्यांनी आपले धर्मांतर होऊ दिले नाही. हिंदूंनी याचा आदर्श घेऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.’

श्रीक्षेत्र द्वारापुर, धारवाड येथील श्री परमात्मा महासंस्थानमचे श्रीगुरु परमात्माजी महाराज म्हणाले, ‘संपूर्ण देशभरात धर्मांतराचा प्रभाव कुठे ना कुठे तरी आहेच. प्रतिदिन भारतात २५०० ते ३००० हिंदूंचे धर्मांतर होत आहे. हे थांबविण्यासाठी कायदा आणला पाहिजे. हिंदु धर्मावरील हा प्रहार रोखण्याासाठी हिंदू बांधवांनी पुढे येऊन सरकारवर यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. हल्ली टी.व्ही. वरील विविध कार्यक्रमांतून हिंदू धर्माची अवहेलना केली जात आहे. हिंदूंनी याविषयी सतर्क असले पाहिजे. ठिकठिकाणी मंदिरांतून हिंदूंना आपल्या धर्माची तत्त्वे, मुलभूत ज्ञान समजावले गेले पाहिजे.’

‘अखिल भारतीय घर वापसी’ संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री प्रबल प्रताप सिंह जूदेव म्हणाले, ‘धर्मांतर एक भयानक षडयंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत आणि हिंदूंना फसवत आहेत. राष्ट्रविरोधी शक्ती हा देश तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हिंदूंनी विशेषत: युवांनी हे सर्व संपविण्यासाठी पुढे आले पाहिजे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून धर्मांतरीत झालेल्या हिंदूंना हिंदु धर्मात पुन:प्रवेश दिला जातो आणि यापुढेही हे कार्य सुरू ठेऊ.’

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘कर्नाटक राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी ख्रिस्ती मिशनरी प्रयत्न करत आहेत आणि धर्मांतरबंदी कायदा आणण्याची मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना करत आहेत. फक्त कर्नाटकच नव्हे; तर संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह कार्य करत आहे. धर्मांतर हे आपल्या देशाला विभाजनाच्या दिशेने घेऊन जाईल, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांतराचा प्रयत्न जिथे केला जात आहे, त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने विरोध करण्यासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे. हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन आपल्या धर्माचा अभिमान बाळगला, तर धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल’.