नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – भारतात फेक मेसेजेस फॉरवर्ड केल्याने काय गदारोळ माजू शकतो, हे मागील काही महिन्यात दिसून आले आहे. त्यामुळे या ‘फेक फॉरवर्ड्स’ला आळा घालण्यासाठी व्हाट्सअॅपने भारतात २० कोटींपेक्षा जास्त युजर्सना एक मेसेड फक्त पाच जणांना फॉरवर्ड करण्याची मर्यादा घातली आहे.
बनावट आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माहितीचा प्रसार रोखण्यात यावा यासाठी केंद्र सरकारने व्हाट्सअॅपला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर व्हाट्सअॅपने भारतात मॅसेज फॉरवर्ड करण्यासाठी पाच चॅटची मर्यादा ठरवण्यासाठी चाचणी घेण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर व्हाट्सअॅपकडून ही पावले उचलण्यात आली आहेत.
व्हाट्सअॅपनं काल म्हणजेच बुधवारी केलेल्या घोषणेनुसार, भारतातील लोकांसाठी या आठवड्यापासून ठरावीक मॅसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. सोबतच, व्हाट्सअॅपकडून युजर्सना याबद्दल माहिती मिळावी यासाठी एक व्हिडिओ देखील शेअर केला जाणार आहे. तसंच मेसेज फॉरवर्ड करताना विचार करूनच फॉरवर्ड करावा अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.