भारतरत्न जे आर डी टाटा यांची भारत देश सुखी राष्ट्र बनावे ही इच्छा नवोदित उद्योजकांनी पूर्णत्वाला न्यावी – बाळासाहेब थोरात

0
208

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा

पिंपरी,दि.१९(पीसीबी) – प्रतिवर्षी महाराष्ट्र राज्य ओद्योगिक विकास परिषद यांच्या वतीने भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या नावाने यशस्वी उद्योजकांना सन्मानित केले जाते. योग्य व्यक्तींची निवड झाली तर पुरस्काराची उंची वाढते.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योग निर्मिती करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील युवा उद्योजकांना भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या नावाचा पुरस्कार पुण्यातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद करीत आहे हा स्तुत्य उपक्रम आहे. उद्योजकांनी भारतरत्न जे आर डी टाटा यांच्याप्रमाणे समाजसेवाभाव जपला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथील मालपाणी सभागृहात उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात बाळासाहेब थोरात म्हणाले.. पुरस्कार देणे आणि घेणे आजकाल फँशन झाली आहे.यावर आधिक न बोललेले बरे! ‘नम्रतेचे दुसरे नाव म्हणजे भारतरत्न जे आर डी टाटा आहेत.’
आमदार डॉ सुधीर तांबे, संगमनेर नगराध्यक्षा सौ दुर्गा तांबे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे, उद्योजक रंगनाथ गोडगे उपस्थित होते.

गणेशपूजन करून उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्याची सुरुवात झाली. कवी प्रशांत केंजळे, कवी राजेंद्र वाघ, कवी राजेंद्र उगले यांनी स्वागतगीत सादर केले. बाजीराव सातपुते यांनी जे आर डी टाटा यांचा समग्र इतिहास कथन केला. डॉ सुधीर तांबे म्हणाले- ‘अनेक उद्योग विकसित झाले तर बेरोजगारी कमी होईल.यासाठी आजच्या तरुणांनी उद्योगक्षेत्राकडे वळले पाहिजे.याचे फलित भारत महासत्ता बनेल!.’

कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश मालपाणी म्हणाले– ‘कोणताही उद्योग कष्टानेच मोठा होत असतो.यासाठी जिद्द, चिकाटी, ध्येयवाद हे गुण उद्योजक म्हणून अंगिकारले पाहिजेत. भारतरत्न जे आर डी टाटा यांचे दातृत्व देशासाठी अभिमानास्पद आहे’

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे म्हणाले– ‘भारतरत्न जे आर डी टाटा यांचा आदर्श उद्योजकांनी घेतला पाहिजे. आपण समाजाचे देणं लागतो याची जाणीव ठेवून सातत्यपूर्ण काम केले पाहिजे. ग्रामीण भागातील किसानपुत्र संघर्ष करून उद्योजक म्हणून पुढे येत आहेत त्यांना स्फूर्ती मिळावी यासाठी परिषद गेल्या अठरा वर्षांपासून नवउद्योजकांना भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या नावाचा पुरस्कार देत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले.संस्थेच्या वतीने घेतले जाणारे उपक्रम,उद्देश याची माहिती दिली. पुरस्कारप्राप्त उद्योजकांना छोटे,छोटे प्रश्न विचारून बोलते केले.
आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर यांना उद्योगमित्र पुरस्कार, नांदेडचे मारोतराव कवळे गुरुजी यांना उद्योगरत्न पुरस्कार, चैतन्य मिल्क फार्म देवळाली प्रवराचे संस्थापक,अध्यक्ष गणेश भांड यांना उद्योगविभूषण पुरस्कार, सुप्रिया पॉलिगर्स संगमनेर संचालक नानासाहेब वर्पे यांना उद्योगभूषण पुरस्कार, चिंचोली गुरव, संगमनेरचे सतीश आभाळे यांना कृषिपुरक उद्योग पुरस्कार, डायनोमर्क कंट्रोल्स भोसरी पुणे येथील अक्षरा राऊत यांना उद्योगसखी पुरस्कार, डायनोमर्क कंट्रोल्स भोसरी पुणे येथील मॅनजर हेमंत नेमाडे यांना उद्योगसारथी पुरस्कार महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.

बहारदार सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. आभार अरुण इंगळे यांनी मानले. महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे,सूर्यकांत मुळे, अरुण गराडे, सुनील उकिरडे, बाजीराव सातपुते ,राजेंद्र वाघ, सुरेश कंक यांनी संयोजनासाठी परिश्रम घेतले. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.