Maharashtra

भाजप-शिवसेना सरकारने जनतेला गाजरे दाखवण्याचे काम केले – अजित पवार

By PCB Author

January 17, 2019

नाशिक, दि. १७ (पीसीबी) – कांद्याला २०० रुपये देऊन  सरकारने काय चेष्टा लावलीय का? असा सवाल करून शेतकऱ्यांना झालेल्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करु नका. भाजप-शिवसेना सरकारने आतापर्यंत जनतेला गाजरे दाखवण्याचे काम केले आहे, असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (गुरूवार) येथे सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेनिमित्त दिंडोरी शहरात  झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते.  साडेचार वर्षांत भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने जनतेला गाजर दाखवण्याचे काम केले. माझ्या शेतकर्‍यांच्या घरात आर्थिक सुबत्ता यावी, पण या सरकारच्या काळात ही सुबत्ताच गायब करण्यात आली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राज्यावर दुष्काळाचे सावट असून  दुष्काळग्रस्त भागात टँकर दिले जात नाही. नारपारचे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे, यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करत आहे. १०० टीएमसी पाणी गुजरातला दिले जात आहे. गुजरात आपलेच राज्य आहे परंतु आम्ही उपाशी, हे चालणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.