भाजप नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये; गावाच्या वेशीवर फलक

0
482

अमरोहा, दि. ६ (पीसीबी) – दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करणाऱ्या भाजप सरकारचा उत्तर प्रदेशातील अमरोहातील धनौरा तालुक्यात अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. धनौरा तालुक्यातील रसूलपूर माफीच्या ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच फलक लावून, भाजप नेत्यांना गावात येण्यास बंदी असल्याचे जाहीर केले आहे.

रसूलपूर माफी गावातील ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करुन एक फलक तयार करण्यात आले आहे. ‘भाजप नेत्यांना गावात येण्यास सक्त मनाई आहे. आल्यास त्यांनी आपल्या जीवाचे रक्षण स्वत:चे स्वत: करावे.’, असा इशाराच रसूलपूर माफीच्या ग्रामस्थांनी भाजपला दिला आहे. जर आमच्या गावात भाजप नेते मतं मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला, त्याचप्रकारे भाजप नेत्यांचे आमच्या गावात स्वागत केले जाईल, असे रसूलपूर माफीतल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, केवळ फलक लावून इथले ग्रामस्थ शांत बसले नाहीत, तर गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवण्यात येते आहे. त्यात कुणी भाजपचा नेता दिसला, तर त्याची खैर नाही, असे ग्रामस्थांनी ठरवले आहे. रसूलपूर माफी गावात जवळपास एक हजार मतदार आहेत. आगामी निवडणुकीत म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत या गावातून भाजपला एकही मत दिले जाणार नाही, असे ठरवण्यात आले आहे. या गावाच्या सीमेवरील भाजपविरोधी फलकाचे फोटो सध्या सोशल मीडियावरही वेगात व्हायरल होत असून, फलक पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आजूबाजूच्या गावातील लोकही येत आहेत.