मुंबई, दि. १६ (पीसीबी) – भाजप कोणालाही फोडत नाही. तुमच्या पक्षातील लोक तुमच्यासोबत राहायला का तयार नाहीत, याचे उत्तर द्या. त्यांचा नेतृत्त्वावर विश्वास उरलेला नाही. अन्यथा कोणताही नेता अशाप्रकारे फुटत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना फटकारले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांची फोडाफोडी केली जात आहे, या विरोधकांच्या आक्षेपाला चोख प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष आमच्यावर आभासी सरकार चालवत असल्याची टीका करतात. मात्र, तेच अजून आभासातून बाहेर आलेले नाहीत. विरोधकांची जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थितीशी असलेली नाळ तुटली आहे. त्यामुळे त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले, असा निशाणा फडणवीस यांनी विरोधकांवर साधला.