भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही – संजय राऊत

0
475

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर अन्याय होईल असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असे विचारले असता, मुख्यमंत्रीपदाचे लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असे जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असेच म्हणावे लागेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसेच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असेही संजय राऊत म्हटले आहेत.

एवढेच नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपाचा डाव आहे असाही आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते त्यांना भेट नाकारण्यात आली का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हाही मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नाही असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहे असेही सांगितले.