Maharashtra

भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

By PCB Author

May 24, 2022

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – जनेच्या प्रश्नांवर आंदोलन करणे हा तर विरोधी पक्षाचा अधिकार आहे. मात्र भाजपवाले आंदोलनाच्या नावाखाली इव्हेंटच जास्त करत असतात, अशी खरमरीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. भाजप हा एक गमतीशीर पक्ष असून ते कोणत्या गोष्टीचा इव्हेंट करतील याचा भरवसा नाही. औरंगाबादमधील पाणीप्रश्नानावरुन भाजपकडून काढण्यात आलेल्या जलआक्रोश मोर्चाचा शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला टोले लगावले आहेत.

मागील काही दिवसांपासून भाजप अनेक आंदोलने करताना दिसत आहे. ही आंदोलने फक्त इव्हेंट म्हणून होत असल्याचे चित्र आहे. भाजपने संभाजीनगरात आधी औरंगजेबाच्या थडग्याचा इव्हेंट केला. तो संपतो की नाही तोवर पाण्याच्या प्रश्नावर जलआक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या जलआक्रोश मोर्चात लोकांची पाण्यासाठी सुरु असलेली तडफड दिसणे अपेक्षित होते. मात्र इथे एखादी शोभायात्रा निघावी व आनंद उत्सव व्हावा असे वातावरण होते.

सजवलेल्या उंट-घोड्यावरून शेळ्या मेंढ्या हाकण्याचे काम सुरु होते. भाजपपुरस्कृत महिला नटून-थटून हातात घागरी घेऊन फुगड्या वगैरे घालत जलआक्रोश करत होत्या. रिकाम्या घागरींचे नेपथ्यही चांगले होते. पण औरंगाबादची जनता यामध्ये सामील झाली नाही, असे म्हणत सेनेने टीकेची झोड उठवली आहे.

अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडण्यात आले आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलन करताना त्यामागील हेतू शुद्ध हवा. पण जलआक्रोश मोर्चाबाबत तसे म्हणता येईल का? देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जलआक्रोश मोर्चामागे अशुद्ध आणि गढूळ झालेल्या राजकारणाचा भाग होता, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेत तुम्हीही आमच्यासोबत सत्तेत होतात, अशी आठवण शिवसेनेकडून भाजपला करुन देण्यात आली आहे. केंद्रात यूपीए सरकार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने समांतर जलवाहिनीची योजना अस्तित्त्वात आली. जनतेला किफायतशीर दरात आणि नियमित पाणी मिळाले असते. मात्र, या योजनेचे श्रेय शिवसेनेला मिळेल, या पोटदुखीतून ही योजनाचा बंद पाडण्यात आली, असा आरोप शिवसेनेने केला.