भाजपाला गेल्या सात वर्षांपासून जे यश मिळतंय ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच

0
310

मुंबई, दि.१० (पीसीबी) : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक कौतुकास्पद वक्तव्य केलं आहे. ‘भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही.’ असं ते म्हणाले. संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

‘नरेंद्र मोदी देशाचे नेते असून ज्या पक्षातून ते पुढे गेले आहेत त्यांना प्रत्येक निवडणूक त्यांच्या नावावरच जिंकावी असं वाटत असेल. अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणं थाबंत नाही. हे शेवटी कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं. दींनी प्रचाराला जाताना पंतप्रधान म्हणून जाऊ नये आणि पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करु नये ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा यंत्रणेवर दबाब असतो. पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं आहे. मनमोहन सिंग किंवा इतर कोणीही असलं तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी प्रचार करु नये. ते देशाचे पंतप्रधान असतात”, असंही संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपाकडून बैठका सुरु असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “भाजपाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर हालचाली सुरु केल्या असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अधिक समनव्याने काम करण्यासंबंधी एकत्रित बैठका सुरु केल्या आहेत. भाजपा राज्यातील प्रमुख आणि मोठा विरोधी पक्ष असून त्यांनी अशा बैठका घेणं अपेक्षित आहे”.