भाजपाची मेगाभरती जोमात; सरकार कोमात

0
418

पुणे, दि.१४ (पीसीबी) – सत्ताधारी भाजपमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची मेगाभरती जोमात सुरू असतानाच राज्य सरकारने मोठा गाजावाजा केलेली मेगाभरती मात्र ‘कोमा’त गेली आहे. राज्यातील ७२ हजार जागा भरण्याची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत सुमारे २ हजार ९०० जागांवरच भरती केल्याचे समोर आले आहे. १२ हजार शिक्षणसेवकांच्या जागांपैकी फक्त अडीच हजार जागा भरण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० नोव्हेंबर २०१८ला ७२ हजार जागांवर प्रत्येकी ३६ हजार याप्रमाणे दोन टप्प्यांमध्ये मेगाभरती करण्याचे अधिवेशनात जाहीर केले होते. सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली. ही पदभरती फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्याने सरकारला बिंदू नामावलीचे काम पुन्हा करावे लागले. मात्र, ही प्रक्रिया धीम्या गतीने झाल्याने भरतीला उशीर झाला. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीनंतर सरकारने तातडीने भरतीची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही प्रक्रिया रेंगाळल्याने आतापर्यंत केवळ २ हजार ८१४ जागांवर पदभरती झाल्याचा दावा बेरोजगार उमेदवारांनी केला आहे.

पहिल्या टप्प्यात ग्रामविकास विभागातील अकरा हजार पाच, सार्वजनिक आरोग्य विभागातील १०,५६८, गृह विभागातील ७,१११, कृषी विभागातील २,५७२, पशुसंवर्धन विभागातील १०४७, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ , जलसंपदा विभागातील ८२७, जलसंधारण विभागातील ४२३, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९०, नगरविकास विभागातील १६६४ पदे अशी सुमारे ३६ हजार पदे भरली जाणार होती. प्रत्यक्षात मात्र, दोन हजार ८१४ जागांवर पदभरती झाली आहे. सरकारने २८१४ हजार जागांवर पदभरती करून बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे स्वभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, पद्माकर होळंबे यांनी सांगितले.

अडीच हजार शिक्षकांची भरती

‘पवित्र’ प्रणालीमार्फत मुलाखतीं शिवाय नऊ हजार ८० पदे भरतीसाठी उपलब्ध होती. त्यापैकी पाच हजार ८२२ पदांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. जिल्हा परिषदेत तीन हजार ५३० आणि महानगरपालिकेत एक हजार ५३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहेत. त्यातील तीन हजार २५८ पदे रिक्त राहिली. खासगी व्यवस्थापनाच्या इयत्ता नववी ते बारावीसाठी उपलब्ध असेलेले ७७१ उमेदवार वगळता इतर पाच हजार ५१ उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात दोन हजार ५६४ पदांवर शिक्षणसेवक पदावर उमेदवार रुजू झाले आहेत, असे विद्यार्थी चळवळीतील अविनाश जाधव यांनी सांगितले.

प्रत्यक्षात झालेली भरती

  • पदे भरती

    तलाठी १८०९

    वनरक्षक ९००

    वन सर्वेक्षक ५१

    आरोग्य विभाग ५४

    ……….

    एकूण २८१४

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ डिसेंबर २०१८ला राज्यात ३६ हजार जागा ऑगस्ट २०१९ पर्यंत भरल्या जातील, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र तीन हजार जागा भरल्या गेल्या. त्यामध्येही महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेतल्याने घोळ झाला आहे. उमेदवारांनी नऊ ते १२ हजार रुपये शुल्क भरून परीक्षांसाठी क्लास लावले. मात्र, परीक्षाच झाल्या नाहीत. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड राग आहे.

राहुल कवठेकर, ओमकार भुसारी, एमपीएससी समन्वय समिती