भाजपशिवाय कुणाचेच सरकार येणार नाही- चंद्रकांत पाटील

0
445

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचेच सरकार येणार नाही. ज्यांच्याकडे ११९ आमदार आहेत, त्यांना घेतल्याशिवाय राज्यात कुणाचेही सरकार बनू शकणार नाही. राज्यात येणार सरकार भाजपचेच असेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कालच राज्यात भाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही, असा दावा केला होता. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपच्या चिंतन बैठकीतील माहिती दिली. यावेळी त्यांनी आमचीही राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर असल्याचे सांगितले. भाजपचे १०५ आमदार असून आम्हाला १४ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमच्याशिवाय कुणाचेही सरकार बनू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही आजच्या बैठकीत हेच स्पष्ट केल्याचे सांगतानाच कुणाबरोबरही कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.