मुंबई, दि. २० (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर आमदारकीचा राजीनामा मागे घेणारे भाजपचे धुळ्यातील नाराज आमदार अनिल गोटे यांनी अवघ्या २४ तासात युटर्न घेत नव्या पक्षाची घोषणा केली आहे. ‘स्वाभिमानी भाजप लोकसंग्राम’ पक्षाच्या माध्यमातून ते धुळे महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या पक्षाचे शिट्टी हे चिन्ह आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांनी गोटे राजीनामा देणार नाहीत, असे म्हटले होते. तसेच गोटे, गिरीश महाजन आणि डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक लढवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, गोटे यांनी आज (मंगळवार) अखेरच्या क्षणी घुमजाव करत सुवतासुभा मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
गोटे म्हणाले की, धुळे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देणार नाही, असे भाजपने म्हटले होते. तर दुसरीकडे धुळे भाजप शहराध्यक्षांच्या यादीत २८ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. एका उमेदवारावर पालिकेतील भ्रष्टाचाराचा आरोप आहे. यासारखे उमेदवार भाजपच्या यादीत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला असताना पक्षाने दगाबाजी केल्याने आपण नविन पक्ष काढण्याचा निर्णय घेतल्याचे गोटे यांनी सांगितले.