मुंबई, दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना भाजपच्या सांगण्यावरूनच झाली आहे. भाजपने मला खासदार केले. मात्र, त्यांनी मला दिलेले शब्द पाळले नाहीत. तसेच मी भाजपाचा सदस्य नाही. त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.
राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, भाजपने मला जाहीरनामा समितीत घेतले, त्याला मी आता काय करू, असा सवालही त्यांनी केला. मी माझ्या पक्षाचाही जाहीरनामा काढणार आहे. एकच माणूस दोन ठिकाणी जाहीरनामा कसा काढेन. त्यावेळी मी भाजपला हे शक्य नसल्याचे पत्र पाठवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा मी लढणार की नाही ते ठरवणार आहे. महाआघाडीत जाण्याचा विचार नाही. पाठिंबा दिला म्हणजे महाआघाडीत गेलो असे होत नाही. राष्ट्रवादीच्या तटकरेंना पाठिंबा दिला, तेव्हा मी राष्ट्रवादीत गेलो, असे झाले नाही, असेही राणे म्हणाले.