मुंबई, दि. १० (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने आमदार-खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रत्येक लोकप्रतिनिधींना त्यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ देण्यात आले. आता निवडणूक घेण्यात आली, तर संबंधित आमदार आणि खासदार यांना किती मते पडतील याची माहितीच लोकप्रतिनिधींना दिली.
भाजपने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघ निहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये जर आता निवडणूक झाली तर कोणाला किती मते मिळतील?, पहिल्यापेक्षा कमी किंवा जास्त मते का मिळाली?, गेल्या ४ वर्षात कोणते कार्यक्रम राबवण्यात आले?, मतदार संघात काय करायची गरज आहे? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणावरून मतदार संघातील परिस्थितीचा अंदाज संबंधित लोकप्रतिनिधींना दिला आहे.
या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. याशिवाय मतदार यादीत नवीन नावे नोंदवण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघात मतदारांच्या नाव नोंदणीसाठी आमदारांना सक्रिय होण्यास सूचना देण्यात आल्या आहेत, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.