औरंगाबाद, दि.१८ (पीसीबी) –नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात जोरदार आंदोलने होत आहेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन देशभर उसळलेल्या आंदोलनामुळे विरोधी पक्षही यावर आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सुद्धा याच मुद्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. तर संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने केली असल्याची टीका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
औरंगाबादमध्ये एमआयएमच्या वतीने २० डिसेंबर नागरिकत्व कायद्याचा विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळावरी खासदार जलील यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली. तसेच देशात सविधान बदलण्यासाठी काही लोकं प्रयत्न करत असून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने याची सुरवात केली असल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला.
भाजप सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला फक्त मुस्लिमच नाही तर सर्वच समाजातील लोकं विरोध करत असल्याचे जलील म्हणाले. तर हा मोर्चा कोणत्याही एका समाजासाठी नव्हे तर देशावर आलेल्या संकटाच्या विरोधात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांवर अन्याय करणारे कितीही कायदे आणले तरीही त्याला जनता मान्य करणार नसून, त्याला आम्ही विरोध करणारच असेही जलील म्हणाले.