Maharashtra

भाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण – अशोक चव्हाण

By PCB Author

July 11, 2019

मुंबई, दि, ११ (पीसीबी) – कर्नाटनमध्ये जे ‘नाट’ चालु आहे. केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करून कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले आहे.  भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून, काल ( बुधवार ) रेनिसन्स हॉटेलमध्ये जणू लोकशाहीचे वस्त्रहरणच झाले आहे. असा घणाघात कॉंग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

कर्नाटकातील काँग्रेस आमदारांचे अपहरण करून त्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबण्यात आले आहे. या आमदारांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते व कर्नाटकचे मंत्री डी.के. शिवकुमार मुंबईत आले. परंतु, आपल्याच पक्षाच्या आमदारांना त्यांना भेटू देण्यात आले नाही. स्वपक्षाच्या आमदारांना भेटण्यात काय गैर आहे? असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

शिवकुमार यांचीही खोली याच हॉटेलमध्ये आरक्षित होती. पण पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये साधा प्रवेशही करू दिला नाही. राज्यातील भाजप सरकार एवढ्यावरच थांबले नाही. तर पोलीस दलाचा गैरवापर करून शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मंत्री आ. नसीम खान यांना अटक करेपर्यंत त्यांची मजल गेली. हा सत्तेचा गैरवापर आणि लोकशाहीची गळचेपी नाही तर आणखी काय आहे? असा संताप देखील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.