Maharashtra

भाजपकडून राज्यात ‘राष्ट्रपती राजवटी’ची मागणी

By PCB Author

March 24, 2021

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. यावेळी भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात सकाळी 9.30 वाजता दाखल झाले. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. गेल्या तासाभरापासून भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु आहेत.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांची तक्रार केली. अनिल देशमुख यांनी पोलीस सहायक यांना 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितले, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा बाब उघड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले.

दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत महत्त्वाचे दुवा ठरलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील सत्ताधाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलीय, असं म्हटलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुखांचा राजीनामा मागितला.

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चिलं जात आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारची बदनामी होत आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलंय. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचं काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असं थोरात यांनी म्हटलं आहे.