“भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील”; गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले

0
190

नांदेड, दि.२४ (पीसीबी) : ‘भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील’, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधत पुन्हा एकदा बिनबुडाच विधान केलं आहे. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गोपीचंद पडळकर हे सुद्धा भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असतील, अशी टीका पडळकर यांनी केलीय.

यावेळी त्यांनी नांदेडमध्ये असलेल्या खड्ड्यावरन बांधकाम मंत्र्यांवर तोंडसुख घेतलंय. मते मागायला आल्यावर पायातलं काढून उभे रहा, असा सल्ला पडळकरांनी मतदारांना दिला. पडळकर यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पडळकर यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाषसाबणे यांच्या प्रचारार्थ कारेगाव, बळेगाव, करडखेल, मरखेल, टाकळी, धनगरवाडी, क्षीरसमुद्र, बेंबरा, बिजलवाडी, कावळगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

दरम्यान, या आधी पडळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. जनाब संजय राऊत, महाराष्ट्रात औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते आणि त्यावरुन उस्मानाबादेत दंगे होतात. तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठीच तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता. जनाब राऊत, तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असलेला भागवा ध्वज लावण्यावरुन जर उस्मानाबादमध्ये पोवलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी एरवी उस्मानाबादला धाराशीव करु म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय? असा सवालही त्यांनी केला होता.

उद्धव सेनेचे 56 आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवीसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केलेली आहे. पण याच ओवीसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. एवढंच नाहीतर अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली होती. आता ‘जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही. योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील. ते सक्षम आहेत. पण महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, असं पडळकर म्हणाले होते.