“भक्त मंडळी सध्या रिकामटेकडी, कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकरी शेकवीत आहेत”

0
407

मुंबई, दि.२४(पीसीबी) – भक्त मंडळी सध्या रिकामटेकडी, कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकरी शेकवीत आहेत, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपचा समाचार घेतला आहे. तसंच पालघर केसवरून जे कुणी राजकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा करत आहेत त्यांच्यावर देखील त्यांनी आजच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. पालघरमधील साधूंची हत्या हा माणुसकीला कलंक आहे. त्याचे राजकारण कोणी करू नये, पण भक्तमंडळी सध्या रिकामटेकडी बसली आहेत व कोरोना युद्धाच्या धुरावर स्वत:च्या भाकऱया शेकवीत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांत ‘लॉक डाऊन’मुळे भूकबळी व त्यातून झुंडबळी सुरू झाले. यावर एखादे चॅनल त्याचे ते डिबेट की काय ते का करत नाही व भक्त मंडळही तोंडाचे लॉकडाऊन करून गप्प का बसले आहेत?, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, पालघरमधील साधूहत्येने महाराष्ट्राच्या इभ्रतीस धोका पोहचला हे खरेच आहे पण ज्या राज्यात गरीब अन्नासाठी बाहेर पडतो तसंच डॉक्टर सेवेसाठी बाहेर पडतो आणि त्यांना मारहाण होते, अशावेळी त्या राज्याची काय इभ्रत वाढते काय? असं म्हणत त्यांनी हा प्रसंग जिथे घडला त्या उत्तर प्रदेश राज्याचं उदाहरण देऊन भाजपवर निशाणा साधला आहे.