Pimpri

भक्ती शक्ती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथील फिरस्ती नागरिकांना तात्काळ हटविण्याची मागणी

By PCB Author

June 07, 2021

 – भाजप युवा मोर्चा मंडलाध्यक्ष शिरीष जेधे यांची आयुक्तांकडे मागणी

निगडी दि.०७ (पीसीबी) – निगडी भक्ती शक्ती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलचा ताबा शेकडो फिरस्ती कुटुंबियांनी घेऊन तेथेच आपले संसार थाटून बस टर्मिनल व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवले असुन भक्ती शक्ती समुह शिल्प चौक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत असल्याने या लोकांना याठिकाणाहुन तात्काळ हटविण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे निगडी चिखली मंडलाचे अध्यक्ष शिरीष जेधे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

टिळक चौकातील निगडी उड्डाणपुलाखाली हेच फिरस्ती कुटुंब आपला संसार उघड्यावर करत असल्याने अनेक सामाजिक संघटनानी याविषयी तक्रार केल्याने त्यांना याठिकाणावरून हलविण्यात आले होते पण त्यांनी आता निगडी भक्ती शक्ती येथील शहराचे मुख्य असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल या अतिशय प्रशस्त आणि देखण्या जागेचा अनधिकृत ताबा घेतल्याने शेजारीच असणाऱ्या भक्ती शक्ती समुह शिल्प, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक व आता नव्यानेच बांधण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती) उड्डाणपुलाचे सौंदर्य लोप पावत चालले आहे, स्मार्ट सिटीकडे आपले शहर खुप मोठया वेगाने पावले उचलत असताना अशाप्रकारे काही कुटुंबे आपले संसार मोक्याच्या ठिकाणी उघड्यावर मांडत असतील तर शहराला बकालपणा येऊ शकते, आणि याठिकाणी वास्तव्य करणारे हे कुटुंब उघड्यावरच प्राथमिक विधी करत असल्याने आरोग्याचा प्रश्नही चिंतेचा विषय आहे. तरी याचा गांभीर्याने विचार करून यांचे तात्काळ दुसरीकडे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी भाजप युवा मोर्चा निगडी चिखली मंडलाध्यक्ष शिरीष जेधे व भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष प्रथमेश आंबेरकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.