“बोलताना काळजी घ्या”, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले

0
631

मुंबई, दि.१४ (पीसीबी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘चौकीदार चोर है’ या वक्तव्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘चौकीदार चोर है’ असा उल्लेख केला होता. तसंच सर्वोच्च न्यायालयानेही हे मान्य केलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याचा संबंध सर्वोच्च न्यायालयाशी जोडल्याने न्यायालयाने त्यांना फटकारलं आहे. राहुल गांधी यांचे विधान खेदजनक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित प्रकरणांवर कोणत्याही प्रकारचं राजकीय भाष्य करताना काळजी घ्या असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या विधानावरुन मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तसंच भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी राफेल कराराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘चौकीदार चोर है’ अशा शब्दांत टीका केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर राहुल गांधी यांनी आता सर्वोच्च न्यायालयानेही ‘चौकीदार चोर है’ मान्य केल्याचा दावा केला होता. यानंतर भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीचं वक्तव्य खेदजनक असल्याचं सांगत माफी मान्य केली आहे