बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकार्याचा वसा शिवसैनिकांनी पुढे चालवावा…..खासदार संजय राऊत थेरगावमध्ये शिवसेनेच्या ‘मातोश्री कोविड केअर सेंटरचे’ उद्‌घाटन

0
459

पिंपरी, दि. 9(पीसीबी) हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एैंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वारसा आपल्याला दिला आहे. हा समाजकार्याचा वसा सर्व शिवसैनिकांना पुढे चालवायचा आहे आणि कोरोनावर विजय मिळवायचा आहे असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने थेरगाव येथिल कैलास मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या मोफत ‘मातोश्री कोविड केअर सेंटरचे’ उद्‌घाटन ऑनलाईन पध्दतीने खा. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, महिला जिल्हा प्रमुख सुलभा उबाळे, शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, रंजना भोसले, ज्ञानेश्वर शिंदे तसेच इरफान सैय्यद, रोमी संधू, निलेश मुटके, हाजी दस्तगीर मणियार, गणेश आहेर, विक्रम वाघमारे, नरसिंग माने, रवि गटकार, हरेश नखाते, गोरख पाटील, प्रदीप दळवी, माऊली जगताप, दत्ता भालेराव तसेच शिवसेनेचे सर्व आजी – माजी नगरसेवक, आजी – माजी पदाधिकारी व शिवसैनिक आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले की, कोरोनाच्या दुस-या लाटेने मोठी पडझड झाली आहे. तिस-या लाटेची भीती आहे. परंतू दुर्दैवाने कोणी आजारी पडले तर घाबरु नये, महाविकास आघाडी सरकार तुमची सर्वतोपरी काळजी घेत आहे. तुम्हाला बेड मिळेल, जर नाहीच मिळाला तर शिवसैनिक तुम्हाला बेड मिळवून देईन. सरकारबरोबर शिवसेना ही समांतर काम करीत आहे. त्यामुळे सरकारवरचा ताण कमी होत आहे. पिंपरी चिंचवड मध्ये ज्या प्रमाणे ‘ट्रिपल सी’ सुरु करण्यात आले आहे. असेच सेंटर राज्यात अनेक ठिकाणी सुरु करण्यासाठी शिवसैनिक काम करीत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आणि महाराष्ट्रात कोविडशी मुकाबला करण्यासाठी मागील वर्षभरात झालेल्या कामाबाबत महाराष्ट्र सरकारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठ थोपटली आहे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शाबासकी दिली आहे. माननिय सर्वोच्च न्यायालयाने देखिल सांगितले आहे की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई मॉडेल वापरावे लागेल. इतर राज्यात बहुतांशी शहरी भागातील जिल्ह्यात स्मशानभुमीत रांगा लागल्या आहेत. तशी परिस्थिती महाराष्ट्रात अद्याप नाही. केंद्राने आता राष्ट्रीय पातळीवर टास्क फोर्सची स्थापना केली आहे. परंतू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक वर्षापुर्वीच तज्ञ डॉक्टरांचा समावेश असणारी टास्क फोर्स समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्र्याच्या नियोजनामुळे महाराष्ट्र या लाटेवरही लवकरच नियंत्रण मिळवेल असा आशावाद खा. राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबईचा आदर्श घेतला पाहिजे असे आता जागतिक संघटनेनेही जाहिर केले आहे. कोविडला घाबरु नका, मनोधैर्य आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली राहिल याबाबत दक्षता घ्या. प्रत्येक शिवसैनिकाने आता ‘माझा वॉर्ड – माझी जबाबदारी’ या प्रमाणे काम केले पाहिजे. येथून बरे होऊन जाणा-या रुग्णांचा, त्यांच्या कुटूंबियांचा तुम्हाला दुवा मिळेल. ज्यांची क्षमता आहे, त्यांनी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून ट्रिपल सी साठी पुढे यावे, असेही आवाहन मिर्लेकर यांनी केले. स्वागत प्रास्ताविक करताना पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले म्हणाले की, पुढील टप्यात भोसरी व पिंपरी विधानसभा मतदार संघात देखिल ट्रिपल सी सुरु करण्याचे नियोजन आहे. आभार वर्षा सचिन भोसले यांनी मानले.