Maharashtra

“बाळासाहेबांना खोटं बोलणारी माणसं आवडत नाहीत, म्हणूनच त्यांनी खोटं बोलणाऱ्यांना पक्षातून हाकलून दिलं!”

By PCB Author

October 10, 2021

– उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला  

मुंबई, दि.१० (पीसीबी) : कालचा संपूर्ण दिवस गाजला तो चिपी विमानतळाच्या सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यादरम्यान झालेल्या शाब्दिक युद्धाने…! अनेक वर्षानंतर दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याने सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. एक-एक करुन नेत्यांची भाषणं पार पडलं. प्रोटोकॉलप्रमाणे नारायण राणेंच्या भाषणाची वेळ आली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार भाषण ठोकत सेनेच्या नेत्यांना सुनावलं. तसंच तुम्हाला चुकीचं ब्रिफींग होतंय, जरा गुप्त माहिती घ्या, असा सल्ला घ्या. एकंदरितच राणेंनी आपल्या 18 मिनिटांच्या भाषणात सेना नेत्यांवर कडाडून प्रहार केले. राणेंच्या भाषणानंतर वेळ होती ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाची.. त्यांनी दमदार भाषण करत राणेंच्या प्रत्येक टीकेला खास पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. कुठलेही टोकाचे शब्द न वापरता कमीत कमी शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना समोरच्याला गप्प करण्याची ताकद पुणेरी टोमण्यांमध्ये असते, हे जगप्रसिद्ध आहे. याच पुणेरी टोमण्यांचा आधार घेत मुंबईच्या ठाकरेंनी ‘सिंधुदुर्ग’च्या नारायण राणेंचं विमान चिपीच्या विमानतळावर क्रॅश केलं.

चिपी विमानतळाच्या उद्घाटन समारंभात शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात अपेक्षेप्रमाणे राजकीय जुगलबंदी रंगताना पाहायला मिळाली. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी सर्वांदेखत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरुन लक्ष्य केले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या पहिल्याच वाक्यापासून नारायण राणे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करुन बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.