सातारा, दि. ९ (पीसीबी) – मातोश्री बॉम्बने उडवून अज्ञातांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट होता, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. याबाबत मी पुस्तक वाचलेले नाही. आताच काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आज (गुरूवार) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मातोश्री बॉम्बने उडवून अज्ञातांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट होता, या नारायण राणेंच्या दाव्यावर प्रश्न विचारला. यावेळी मी पुस्तक वाचले नाही. यावर आत्ताच बोलणार नाही. पुस्तक वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईन, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतही दोन गौप्यस्फोट करण्यात आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलेल्या धमकीचाही गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या आत्मचरित्राची मराठी आवृत्ती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.