रोम, दि.८ (पीसीबी) – भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये सुमारे १३० ते १७० दहशतवादी ठार झाले आहेत. तर या हल्ल्यातील ४५ जखमी दहशतवाद्यांवर पाकिस्तानातील रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत, असा दावा इटलीच्या एका पत्रकार महिलेने केला आहे.
फ्रँसेसा मॅरिनो असे पत्रकार महिलेचे नाव आहे. त्यांनी ‘स्ट्रिंगरेशिया’ (STRINGERASIA.IT) या संकेतस्थळावर एक वृत्तांत छापून त्यात या हल्ल्याची विस्तृत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाने पहाटे साडे तीन वाजता बालाकोटवर हल्ला केला.
शिंकयारी बालाकोटपासून २० किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे पाकिस्तानी आर्मीचा बेस कँम्पही आहे. या ठिकाणी पाकिस्तानची ज्यूनियर लीडर्स अकादमी सुद्धा आहे. आर्मीची तुकडी बालाकोटला पोहोचल्यानंतर तिथून अनेक जखमींना पाकिस्तानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारावेळी २० लोकांचा मृत्यू झाल्याचेही मॅरिनोने या वृत्तांतात म्हटले आहे. उपचारानंतर डिस्चार्ज झालेल्या लोकांना पाकिस्तान आर्मीने त्यांच्या कोठडीत ठेवले आहे.
मृतांमध्ये ११ ट्रेनरचा समावेश आहे. मृतांमध्ये काही बॉम्ब बनविणाऱ्या आणि शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यांचाही समावेश आहे. हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांकडून कोणतीही माहिती लिक होऊ नये म्हणून जैशने विशेष काळजी घेतली आहे. मृतकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना जैशने नुकसान भरपाई दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.