बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का?; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना सवाल

0
390

पुणे, दि. १५ (पीसीबी) – शरद पवार यांच्या बारामतीमध्ये जाण्यास आणि तिथे सभा घेण्यास लोकशाहीमध्ये मनाई आहे का?  बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का?, असा सवाल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमच्या येथे येऊन सभा घ्या. आम्ही तुम्हाला मदत करू,  असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

बारामतीत महाजनादेश यात्रेदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलीस त्यांच्याकडे येत असल्याचे दिसताच त्यांनी तेथून पळ काढला. मात्र या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. अशा बातम्या पसरवल्या जात आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसून पोलिसांनी असा कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.