“बाबासाहेबांनी घटनेत जे लिहून ठेवलंय तेच आम्ही करत आहोत”

0
309

मुंबई,दि.२३(पीसीबी) – नागरिकत्व सुधारणा कायदा हा नवीन कायदा नाही, तर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांनी यापूर्वीच लिहून ठेवलं आहे, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएएला समर्थन दिलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) या मुद्द्यांवरुन देशात अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. सीएए आणि एनआरसीला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.

नागरिकत्व कायद्यावरुन लोकांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. राजकीय फायद्यासाठी हे होत आहे. पण या कायद्यामुळे कोणत्याही मुस्लीमाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, असं आश्वासन गडकरींनी दिलं आहे.