Maharashtra

बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

December 06, 2018

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – भारत जगातील सर्वोत्तम देश बनवण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या  संविधानाचा मोलाचा वाटा आहे. आम्ही त्यांच्या विचारांचे पालन करत  राज्यकारभार चालवत आहोत. बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरूवार)  येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी समतेचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न  साकार करण्यासाठी  आम्ही काम करत आहोत. तळागाळातील माणसांपर्यंत विकास पोहोचविण्यास आम्ही कटीबध्द आहोत. त्या दिशेने सरकार काम करत आहे. बाबासाहेबांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.