Desh

बाबरी मशीदप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; कोर्टाचा निकाल

By PCB Author

September 30, 2020

देश,दि.३०(पीसीबी) – तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, तत्कालीन शिवसेना नेते बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

दरम्यान न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.