फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच महायुतीचे सरकार बनेल- नितीन गडकरी

0
502

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवसांचा काळ उलटल्यानंतरही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांत सत्ता संघर्ष सुरू असण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने, देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात राज्यातील सरकार बनेल, असे वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार स्थापन करतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही अफवा असल्याचेही ते म्हणाले. सध्या आपण दिल्लीत असून राज्यात येण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.

राज्यात भाजप-शिवसेनेला बहुमताचा कौल मिळालेला असून सत्ता स्थापनेचा निर्णय लवकरच होईल. भारतीय जनता पक्षाचे म्हणाल तर, देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार स्थापन होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाने १०५ जागा जिंकल्या असून हे पाहता ज्याने जास्त जागा जिंकल्या आहेत, त्याच पक्षाचा मु्ख्यमंत्री होतो, असेही गडकरी यांनी अधोरेखित केले.