बारामती, दि. २१ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वयाइतकी शरद पवार साहेबांची राजकीय कारकीर्द झाली आहे. याचा त्यांना विसर पडला असावा. फडणवीस यांना बेटी भगाव आणि बेटी नचाओ हे धोरण चालते का ? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज (रविवार) येथे केला.
जेजुरीमध्ये बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवारांचे बेटी बचाओ, असे धोरण चालू आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. या टीकेला अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
पवार म्हणाले की, शिवतारे यांना आयती करून ठेवलेली कामे देखील १० वर्षात सांभाळता आली नाहीत. एक रस्ता देखील व्यवस्थित पूर्ण करता आला नाही, आणि आता माझ्या समोर गप्पा मारत आहेत, असा निशाणा शिवतारे यांच्यावर साधला. फडणवीस यांना विसर पडला असावा की, फडणवीसांच्या वया इतकी शरद पवार साहेबांची राजकीय कारकीर्द आहे, असाही टोला पवारांनी लगावला.