“फक्त सावरकर कशाला नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या”, ओवेसींचा भाजपाला टोला

0
463

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – एमआयएम अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका करत महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या असा टोला लगावला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरुनच ओवेसी यांनी हा टोला लगावला आहे.

ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटले आहे की, “फक्त एकट्या सावरकरांसाठी का? महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेसाठीदेखील भारताचा सर्वोत्कृष्ट सन्मान का मागत नाही”. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “महात्मा गांधीच्या हत्येच्या कटात सहभागी व्यक्तीला भारतरत्न देण्यासंबंधी कसा काय विचार केला जाऊ शकतो. जर तुम्ही सावरकरांना देत असाल तर मग नथुराम गोडसेलाही भारतरत्न द्या”.

“आपल्या पुढील पिढ्यांसमोर उदाहरण राहील अशा व्यक्तींना भारतरत्न दिला पाहिजे, ज्यांनी इंग्रजांशी लढा दिला आणि कधी माफीही नाही मागितली,” असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, “सावरकरांना भारतरत्न दिले जावे यासाठी आपले सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे”. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.