Pune

फक्त रामदास आठवले यांचेच कल्याण झाले. समाजाच्या वाट्याला काय आलं

By PCB Author

April 14, 2022

राजगुरुनगर, दि. १४ (पीसीबी) : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गंभीर आरोप करीत आठवलेंवर टीकेची झोड उठवली आहे. महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रामदास आठवले यांनी समाजासाठी काय केलं, असा सवाल उपस्थित केला. ‘गेल्या सात वर्षात फक्त रामदास आठवले यांचेच कल्याण झाले. समाजाच्या वाट्याला काय आलं, हे आठवलेंनी एकदा सांगितलं पाहिजे,” असे दिलीप मोहिते पाटील म्हणाले.

”रामदास आठवलेंनी स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठिस धरु नये,” असे त्यांनी सुनावले. ”ते स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला वेठीस धरत असलील, तर त्यांच्या मागे समाजाने जाण्याची गरज नाही,” असे मोहिते-पाटील म्हणाले. ”केंद्र सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा पाठिंबा आहे, मात्र केंद्राचा सध्याचा कारभार पाहता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल, त्यामुळे रामदास आठवले स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरु नका, समाजाचा बळी देऊ नका. यातून समाजाचा फायदा होणार नाही झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल,” असे मोहिते पाटील म्हणाले.

”केंद्र सरकारकडून भाजपाच्या लोकांना एक न्याय आणि राज्यातील इतरांना वेगळ्या प्रकारची वागणुक दिली जाते असा प्रकार राज्य सुरु आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांनी तयार केलेली घटना सुद्धा बदलायला किंवा दुरुस्त करायला मागेपुढे पाहणार नाही, अशी भीती मोहिते-पाटलांनी व्यक्त केली. यावेळी भिम शक्तीचे अध्यक्ष विजय डोळस, विद्याधर साळवे, संतोष डोळस, अशोक कडलक कैलास सांडभोर ,वैभव घुमटकर उपस्थित होते.