Maharashtra

फक्त दोन महिने थांबा, काँग्रेस, राष्ट्रवादीला गळती लागेल; रावसाहेब दानवेंची भविष्यवाणी

By PCB Author

October 10, 2018

मुंबई, दि. १० (पीसीबी) – लोकसभेच्या निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा अवधी आहे. फक्त दोन महिने थांबा. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना गळती लागणार आहे, अशी भविष्यवाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वर्तवली आहे. समविचारी पक्षांची आमच्यासोबत लढण्याची तयारी नसेल, तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रावसाहेब दानवे म्हणाले, “नशिबाच्या जोरावर निवडणुका लढवण्याचे दिवस आता संपले आहेत. संघटनेच्या बळावर निवडणुकांना सामोरे जाण्याची ही वेळ आहे. त्यामुळे भाजप विकासाचा अजेंडा घेऊन संघटनेच्या बळावरच निवडणुकांना सामोरे जाईल. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अन्य पक्षांतील अनेक नेते इच्छुक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा अवधी आहे. फक्त दोन महिने थांबा. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना गळती लागणार आहे. भाजपमध्ये पक्ष ध्येय धोरणानुसार योग्य व्यक्तीला योग्य ती संधी देण्यात येईल.

भाजपमध्ये प्रवेश करणारी व्यक्ती ही केवळ संघाचीच असली पाहिजे, असे नाही तर राष्ट्रहिताचे विचार असणारी, कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती असेल तरीही त्याला प्रवेश देण्याचे धोरण भाजपचे आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढणार आहे. अशा सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा पक्षस्तरावर यथोचित सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले.”