नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – महात्मा गांधीजी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. २ ऑक्टोबर रोजी १५० व्या जयंतीनिमित्त गांधींजींना हागणदारीमुक्त भारत समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाची सुरूवात करु, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी आज ( रविवार) आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री कृष्ण आणि १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करून मोदींनी कार्यक्रमाला सुरूवात केली.
२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ सुरू करण्याची घोषणा यावेळी मोदींनी केली. तसेच, ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्गाप्रति असलेली संवेदनशीलता आदी गोष्टींची जगाला ओळख होईल, असे त्यांनी सांगितले.
जन्माष्टमीचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. सत्यासोबत गांधींचे जितके अतूट नाते राहिले आहे. तितकेच अतुट नाते लोकांची सेवा करण्यामध्येही राहिले आहे.
२ ऑक्टोबर रोजी १५० व्या जयंतीनिमित्त गांधींजींना हागणदारीमुक्त भारत समर्पित करु आणि प्लास्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाची सुरूवात करु, असे मोदी म्हणाले. जागरुकता नसल्याने कुपोषणाचा परिणाम गरीब आणि संपन्न दोन्ही प्रकारच्या कुटुंबांवर पडत आहे. त्यामुळे याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी सप्टेंबर हा महिना ‘पोषण अभियान’ महिना म्हणून ओळखला जाईल, असे मोदींनी सांगितले.