प्रेम प्रकरणातून पिंपरीतील विद्यार्थ्याचे केले अपहरण; चाकणमध्ये नेऊन केली जबर मारहाण

1970

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – प्रेम प्रकरणातून एका २१ वर्षीय विद्यार्थ्याचे पिंपरीतील डॉ.डी.वाय पाटील कॉलेजजवळून अपहरण केले. त्यानंतर चाकण येथे नेवून जबर मारहाण केली आणि त्याच्याजवळील मोबाईल काढून घेतला. ही घटना शुक्रवार (दि.२९ जून) सकाळी सव्वानऊ ते बाराच्या दरम्यान घडली.

सुरज राजेंद्र भांगरे (वय २१, रा. म्हाळुंगे इंगळे, खेड, रो हाऊस क्र.१४८, द्वारकानगरी) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, तन्मय कालीदास मेदनकर, कालीदास मल्हारी मेदनकर (दोघे, रा. मेदनकरवाडी, चाकण), तेजस रामदास धनवटे (रा. कडाचीवाडी, चाकण) आणि एमएच/१४/३१३१ या दुचाकीवरील अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज आणि आरोपी कालीदास यांच्या २० वर्षीय मुलीचे प्रेम संबंध होती. यामुळे शुक्रवारी (दि.२९ जून) सकाळी सव्वानऊच्या सुमारास मुलीचे वडिल कालीदास भाऊ तन्मय, तेजस आणि  एमएच/१४/३१३१ या दुचाकीवरील अनोळखी इसमाने पिंपरीतील डॉ.डी.वाय पाटील कॉलेजजवळ उभा असलेला सुरज याला लाथाबुक्कायांनी जबर मारहाण करत त्याला जबरदस्तीने फॉरच्युनर गाडी नं. (एमएच/१४/१७१७) मधे बसवले.  त्यानंतर आरोपींनी सुरज याला चाकण पोस्ट ऑफिसजवळ नेऊन पुन्हा मारहाण करत त्याच्याजवळील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. याप्रकरणी आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे तपास करत आहेत.