मुंबई, दि. १७ (पीसीबी) – उत्तर भारतीय समाज हा मुंबईचा कणा असून मुंबईची प्रगती होण्यासाठी या समाजाने खूप कष्ट घेतले आहे. तसेच महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणूनही या समाजाने खूप मेहनत केली आहे, असे विधान भाजप खासदार पूनम महाजन यांनी आज (गुरूवार) येथे केले आहे.
भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पूनम महाजन यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांचे नात खूप जुने आहे. प्रभू रामचंद्र हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय होते, असा दाखला त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, उत्तर भारतीयांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायम लक्ष्य केले आहे. आता पूनम महाजन यांनी उत्तर भारतीय हे मुंबईचा कणा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.