प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन- सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची संधी

0
316

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : नापिक आणि अकृषिक जमिनीचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणारी वीज महावितरणला विकून अथवा सौर प्रकल्पासाठी जमिन भाडे पट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत 0.5 ते 2 मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA) हे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करु शकतात आणि जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते विकासकांद्वारे सौर ऊर्जा प्रकल्प विकसीत करण्याचा पर्याय निवडू शकतात. अशा परिस्थितीत भाडे पट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे.

हे प्रकल्प जमिनीवरील सौर प्रकल्पाची उभारणी स्टिील्ट रचना वापरुनही उभारता येईल जेणेकरुन शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीचा वापर भाडेपट्टी व्यतिरिक्त पिकांच्या लागवडीकरिताही होऊ शकेल. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरणमार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.

प्रधानमंत्री कुसुम योजना (घटक अ) अंतर्गत योजनेमध्ये निविदेद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA) यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तथापि, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता पुढील अटी बंधनकारक राहतील. बयाणा रक्कम (EMD) रु. 1 लाख/मेगावॅट, परफॉर्मनस बँक गॅरंटी (PBG) रु. 5 लाख/मेगावॅट, उद्देशिय पत्र जारी केल्यापासून 12 महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वन करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून 25 वर्षाकरिता रु. 3.10 प्रति युनिट दराने राहील.

या योजनेअंतर्गत महावितरणने 487 मे.वॅ. करिता निविदा जाहिर केल्या आहेत आणि निविदा भरण्याची शेवटची तारीख दि. 05 ऑक्टोबर 2021 आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp वेब पोर्टल वर भेट द्यावी.