प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणी प्रक्रियेला पुणे जिह्यात प्रारंभ

0
865

पुणे, दि. २२ (पीसीबी) – केंद्र शासनामार्फत देशातील १८ ते ४० वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पी.एम.के.एम.वाय) सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ६० वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

या योजनेसाठी भु-अभिलेखानुसार ज्या शेतक-यांच्या नावे २ हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे शेतकरी पात्र आहेत. ही योजना ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना आहे. शेतक-यांनी त्यांच्या १ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या वयानुसार रक्कम रुपये ५५  ते दोनशे रुपये याप्रमाणे वयाच्या ६० वर्षापर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतक-ऱ्यांच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन पेन्शन फंडामध्ये भरणार आहे. या योजनेत सहभागी शेतक-यांना ६० वर्षे वयानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

या योजनेतंर्गत शेतक-यांनी सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रुपये ३० सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी आधारकार्ड, बॅक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे. या योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.