प्रत्येक बेपत्ता मुलगी चित्रपटाप्रमाणे सतत प्रियकरासोबत पळून जात नाही- उच्च न्यायालय

0
342

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – ठाणे जिल्ह्यात २०१७ मध्ये बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात अपयश आल्यानंतर मुंबई हायकोर्टाने पोलिसांना चांगलेच फटकारले. बेपत्ता झालेली प्रत्येक अल्पवयीन मुलगी चित्रपटातील कथानकाप्रमाणे प्रियकरासोबतच पळून गेली असेल असा समज करून घेऊ नये. पोलिसांनी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे कोर्टाने म्हटले.

बेपत्ता मुलीच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पोलिस तपासाला गती मिळावी, अशी मागणी यात करण्यात आली. १० जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना न्या. एस.सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या पीठाने पोलिसांच्या मानसिकतेवर नाराजी व्यक्त केली.

कोर्ट म्हणाले, ‘मुलगी बेपत्ता होणे ही जीवनातील वास्तविक घटना आहे. ही बाब अधिकाऱ्यांनी कदापि विसरू नये. समाजात अनेक लोकांना पाल्य बेपत्ता झाल्याचे दु:ख सहन करावे लागत आहे. बेपत्ता झालेल्या मुलांनाही प्रचंड यातना भोगाव्या लागत आहेत.’ याअगोदर अतिरिक्त सरकारी वकील जे.पी. याज्ञिक बाजू मांडताना म्हणाले की, शाळेतील एका मुलाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याचे तपासात उघड झाले आहे. यावर पीठाने हे प्रकरण मुलीच्या कथित अपहरणाशी संबंधित असल्याचे म्हटले. या प्रकरणातील सद्य:स्थितीतील तपासाचा अहवाल पोलिसांनी दोन आठवड्यांत सादर करावा, असे आदेश कोर्टाने दिले. याशिवाय अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलावी, अशी आशाही व्यक्त केली.