प्रतिस्पर्ध्याची जात काढून जातीय विद्वेष पसरवण्याचे शरद पवारांचे राजकारण जुने – माधव भांडारी

0
1410

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – गेल्या दोन-तीन वर्षांपासून सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मनातील जातीय विद्वेषातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत:च महाराष्ट्रात जाती-पातीचे राजकारण करत आहेत. तसेच समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आपल्याच राजकारणाचे वर्णन करताना पवार भाजपचे  नांव घेत आहेत,  असे चोख प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शरद पवारांना दिले आहे.  

मराठा आरक्षणावरून राज्यातील फडणवीस सरकारचा समाजामध्ये फूट पाडण्याचा डाव आहे, असा  आरोप शरद पवार यांनी केला होता. या आरोपाला भांडारी यांनी उत्तर दिले आहे. पवार यांचा आरोप बिनबुडाचा आहे. उलट आपल्या प्रतिस्पर्ध्याची जात काढण्याची व त्यातून जातीय विद्वेष पसरवण्याचे पवारांचे राजकारण जुने असून ते सर्वांना माहित  आहे, असे भांडारी म्हणाले.

जोशी आडनावाचा माणूस शेतकऱ्यांचा नेता होऊ शकतो  का? असा सवाल करत शरद जोशी यांची जात पवारांनी काढली होती. ऊस आंदोलनावरून खासदार राजू शेट्टी यांची जात काढली. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी मिळाली, तेव्हा छत्रपती आणि पेशवे असे उदाहरण देऊन  पवारांनी फडणवीस यांची जात काढण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व पवारांचे राजकारण महाराष्ट्राला माहित आहे. इतरांच्या जाती काढून समाजात विद्वेष पसरवण्याचे काम शरद पवार करत आहेत. उलट भाजपवरच आरोप करत आहे, यापेक्षा    दुसरा मोठा विनोद नसेल,  अशी टीका  माधव भांडारी यांनी केली .