मुंबई, दि. ३० (पीसीबी) – शिवसेनेमध्ये पैसे घेऊन पदे दिली जात आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षात डावलून त्यांना किंमत दिली जात नाही, असा आरोप उल्हासनगरमधील एका शिवसैनिकाने केला आहे. शिवसेना नेत्यांना एक पत्र लिहून त्यांने आपली नाराजी व्यक्त केली आहे. पुढील वेळी प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या, असा इशारा त्याने पत्रात दिला आहे.
विलास मुकादम असे या शिवसैनिकाचे नाव आहे. ते १९८८ पासून उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे काम करत आहेत. मात्र या काळात अनेकदा पदे देण्याची वेळ आली, की आपल्याला डावलले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सध्याची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते एका रात्रीत जाऊन पदे, तिकीटे घेऊन येतात. मात्र, तळागाळात काम करणाऱ्या, वडापाव खाऊन झेंडे लावणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला आज पक्षात किंमत नाही, अशी नाराजी मुकादम यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, याबाबत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले की, मुकादम हे गेल्या काही वर्षांपासून पक्षात सक्रिय नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करू, असे त्यांनी सांगितले.