प्रकाश आंबेडकरांशी ऐक्य झाल्यास आंबेडकरी चळवळीची मोठी शक्ती – रामदास आठवले

0
420

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्षातील विविध गटातटाचे ऐक्य होत असेल तर आपण नेतृत्वाच्या वादात पडणार नाही. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले एकत्र आले तर महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीची मोठी शक्ती निर्माण होईल, असे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी सांगितले.

रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण केंद्रातील मंत्रिपद सोडायला तयार आहे’, याचा आठवले यांनी पुनरुच्चार केला. ‘आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनी विचारवंतांसारखेच वागायला हवे. शिवशक्ती-भिमशक्तीचा प्रयोग आम्ही सल्ला देणाऱ्या विचारवंतांच्या म्हणण्यानुसारच केला होता. केंद्रातील तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती, हे मुणगेकर यांनी विसरता कामा नये’, असा टोला आठवले यांनी त्यांना लगावला. ‘गेल्या पाच वर्षांतील कामाच्या यशावर भाजपला यश मिळेल’, असा दावा त्यांनी केला. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सन २०२०पर्यंत पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

महायुतीत राज ठाकरे नाहीच

‘मनसे नेते राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होत असली तरी त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होणार नाही. महायुतीत राज ठाकरे यांना आणण्याचा आपण अजिबात प्रयत्न करणार नाही. कारण राज ठाकरे महायुतीत आले तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे नाराज होतील. सध्या उद्धव ठाकरे यांना नाराज करण्याचे आपले धोरण नाही’, असेही आठवले यावेळी म्हणाले.