पोलिसात तक्रार का दिली म्हणत महिलेला वरवंट्याने मारहाण

0
1228

राजगुरूनगर, दि. ९ (पीसीबी) – मारहाणीची तक्रार पोलिसात दिल्याने चार जणांनी मिळून एका महिलेला बेदम मारहाण केली. त्यातील एकाने महिलेच्या डोक्यात वरवंटा मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी खेड तालुक्यातील धानोरे फाटा येथे घडली.

सुनीता अनिल पाखरे (वय 28, रा. पीसीएस कंपनीजवळ, धानोरे फाटा, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नामदेव त्रिभुवन, अमोल नामदेव त्रिभुवन, ज्ञानेश्वर नामदेव त्रिभुवन, अर्जुन नामदेव त्रिभुवन (सर्व रा. पीसीएस कंपनीजवळ, धानोरे फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 7) आरोपी आणि फिर्यादी यांचे भांडण झाले होते. या भांडणाची तक्रार फिर्यादी यांनी पोलिसात दिली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.

सोमवारी सकाळी आठ वाजता फिर्यादी पाखरे घरासमोरील अंगणात झाडू मारत होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपी अमोल याने वरवंटा घेऊन पाखरे यांच्या डोक्यात मारून जखमी केले.

भांडणाचा आवाज ऐकून पाखरे यांचे पती अनिल पाखरे, आई सुदिनाबाई आठवले, बहीण रिना आठवले हे सर्वजण भांडणे सोडविण्यासाठी आले. आरोपी अमोल याने फिर्यादी यांच्या पतीला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिली. आरोपी ज्ञानेश्वर याने फिर्यादी यांच्या बहिणीला काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.