पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती आसाम विधानसभेच्या आगामी निवडणुकीची जबाबदारी

0
244

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांची कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड केली आहे. साठे यांच्याकडे आसाम राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुढील वर्षी आसाम विधानसभेच्या निवडणुका होत असून त्यादृष्टीने त्यांची निवड महत्वाची मानली जात असून एका मराठी तरुण कार्यकर्त्यावर पक्षाने मोठा विश्वास दाखवलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातून काँग्रेसमध्या इतक्या मोठ्या पदावर एका कार्यकर्त्याला प्रथमच संधी मिळाली आहे.

पृथ्वीराज साठे यांनी १९९२ मध्ये एनएसयुआयच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी एनएसयुच्या पाठिंब्याने निवडणूक लढवून विजयही संपादन केला होता. त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रसचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुलजी गांधी यांच्या कोअर ग्रुपचे ते सदस्य होते. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वय पदावर असताना कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नात्याने पक्षाच्या दैनंदिन कामकाजात तसेच प्रदेशाध्यक्षांचे दैनंदिन कामकाजात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे.

साठे हे उच्चाविद्याभूषीत आहेत. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. पक्ष संघटना बांधणीच्या कामातही त्यांचा हातखंडा आहे. समाजातील विविध लोकांशी, संघटनांशी असलेला दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पिंपरी चिंचवड शहराचे दिवंगत माजी महापौर प्रभाकर साठे यांचे ते चिरंजीव होत. पृथ्वीराज साठे यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी राष्ट्रीय सचिवपदी बढती देत आसाम राज्याची जबाबदारीही सोपवलेली आहे.