पुलवामा हल्ल्याचा फायदा कोणाला झाला? – राहुल गांधी

0
431

देश,दि.१४(पीसीबी) – काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात तीन प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्याला वर्ष झाल्यानिमित्त राहुल गांधींनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवनांच्या तिरंग्यामध्ये लपेटलेल्या शवपेट्यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राहुल यांनी तीन प्रश्न विचारले आहेत.

“आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० शहीद जवांनाच्या हौतात्माचे स्मरण करत आहोत. त्यानिमित्त आपण काही प्रश्न विचारायला हवेत… १) या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?, २) या हल्ल्याच्या तपासामधून काय निष्पन्न झालं? ३) ज्या सुरक्षासंदर्भातील त्रुटींमुळे हा हल्ला झाला त्यासाठी भाजपा सरकारमधील कोणत्या व्यक्तीला जबाबदार धरण्यात आलं?,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. या मधून त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. आज या भीषण हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद जवांनांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे.