पुण्यातील मानाच्या ५ गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन; रविवारी सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार

1346

पुणे, दि. २२ (पीसीबी) – पुण्यातील जगप्रसिद्ध गणपती विसर्जन मिरवणुकीचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यामुळे देशविदेशातील हजारो नागरिक ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात. परंतु, मागील काही वर्षांपासून ही मिरवणूक दीड दिवसांहून अधिक काळ चालत असल्यामुळे त्याचा पोलिसांवर प्रचंड ताण पडतो. त्यामुळे पुण्यातील मानाच्या पाच मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत काढून कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा संदेश दिला जाणार आहे. तसेच मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये केवळ १५ मिनिटांचे अंतर ठेवले जाणार आहे. त्यामुळे यावर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रविवारी (दि. २३) सकाळी साडेदहा वाजता पुण्याच्या मंडईतील टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची पूजा पालकमंत्री, महापौर व महापालिका आयुक्तांच्या हस्ते होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात केली जाईल. पहिल्या मानाच्या गणपतीनंतर तांबडा जोगेश्वरी, गुरूजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात होईल. तसेच यावर्षीपासून मंडईऐवजी बेलबाग चौकातून गणपती मंडळांची पथके लावण्यात येणार आहेत.

प्रत्येक मंडळाची तीन पथके असणार असून त्यातील ढोल ताशा पथक, बँड, दिंड्या यातील सदस्यांची संख्या सीमित करण्यात आली आहे. ढोलताशा पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारक आणि मदतीसाठी ३० जण असणार आहेत. अलका टॉकीज चौकात मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या मिरवणुकीत दरवर्षीपेक्षा कमी वेळेत मिरवणूक संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुण्यातील पाचही मानाचे गणपती १५- १५ मिनिटांच्या अंतराने डेक्कनच्या लकडी पुलाजवळ कृत्रिम हौदात गणपती विसर्जन करतील. लक्ष्मी रस्त्यावर २ मंडळांतील अंतर कमी करून वेळ वाचवण्याचा प्रयत्न राहिल. त्यामुळे यावर्षी वेळेत गणपती विसर्जन मिरवणूक संपेल आणि पोलिस सुटकेचा निश्वास सोडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.