पिंपरी-चिंचवड मधील सौ. अंजना व श्री. जगन्नाथ पायमोडे या दांपत्याला राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्कार प्रदान

0
667

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड (भोसरी) मधील श्री‌. जगन्नाथ खंडू पायमोडे आणि सौ. अंजना जगन्नाथ पायमोडे या दांपत्याला पुण्यातील सुसंगत फाउंडेशन कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘ आदर्श माता-पिता ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रविवार दि. १६ जानेवारी रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. दिपक शिकारपुर (माजी प्रांतपाल रोटरी इंटरनॅशनल, माहिती तंत्र उद्योजक) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. प्रशांत देशमुख (माजी प्रांतपाल रोटरी इंटरनॅशनल, अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त उद्योजक) होते.

मुळचे जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावचे अल्पभूधारक शेतकरी असलेल्या श्री. जगन्नाथ व सौ. अंजना यांनी अतिशय खडतर आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले.
सद्या त्यांची दोन्ही मुले निलेश व डॉ. दिनेश हे औषधनिर्माण शास्त्रात ‘वरिष्ठ शास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत आहेत. थोरला मुलगा निलेश हे हैद्राबाद येथे ‘साई लाईफ सायन्सेस लिमीटेड’ या औषधनिर्माण संशोधन कंपनीत शास्त्रज्ञ आहेत. निलेश यांनी पुण्यातील एन. वाडीया महाविद्यालयातून सण २००८ साली रसायनशास्त्रातील पदवी संपादन केली होती.

धाकटा मुलगा डाॅ. दिनेश हे अमेरिकेतील ‘मिराती थेरॅप्युटीक्स’ या औषधनिर्माण शास्त्रातील संशोधन कंपनीत संशोधनाचे कार्य करत आहेत. या पुर्वी डॉ. दिनेश यांनी अमेरिकेतील ‘मेडिसीन्स फाॅर ऑल’ व ‘ओक्लाहोमा युनिव्हर्सिटी’ मध्ये तीन वर्ष विवीध रोगांवरील औषधे व रासायनिक संयूगांवर यशस्वी संशोधन केले.

अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. दिनेश यांनी कोवीड-१९ वरील परिणामकारक ‘रेमडिसिव्हीर’ आणि नुकतेच आपात्कालीन वापरास परवानगी मिळालेले ‘मॉल्नूपिरावीर’ या औषधांच्या निर्मीती प्रक्रिया विकसित केल्या आहेत. तसेच त्यांनी कॅंसर, एच. आय. व्ही. (एड्स), मलेरिया आणि काविळ इ. रोगांवरील परिणामकारक औषधांच्या संशोधनात महत्त्वाचे काम केले आहे. त्यांचे हे संशोधन विविध १२ अंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. सण २०१८ मधे दिनेश यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून रसायनशास्त्रात पि.एच. डी. संपादन केली होती.

केवळ इयत्ता नववी शिक्षण घेतलेले जगन्नाथ आणि इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अंजना हे मुळचे शेतकरी कुटुंब. परंतु अवघी अर्धा एकर शेती क्षेत्र असलेल्या पायमोडे दांपत्याला जोडीला दुग्धव्यवसाय, मोलमजुरी करावी लागत असत. अतिशय शांत, संयमी आणि सुस्वभावी अशा आपल्या मुलांना चांगल्या संस्काराचे बाळकडू त्यांच्या आईकडून त्यांना मिळाले असे जगन्नाथ सांगतात. काबाडकष्ट करून उपजीविका करत असताना मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंबाच्या प्रामाणिक आचरण व सुस्वभावामुळे त्यांना नातेवाईकांनी आणि शिक्षकांनी वेळोवेळी खुप मदत केली असं पायमोडे सांगतात.

‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पायमोडे दांपत्याने “हा पुरस्कार म्हणजे आमच्या सोबतच अशा प्रत्येक कष्टकरी माता-पित्याचा सन्मान आहे, कि जे आपल्या मुलांना पुस्तकी शिक्षणासोबतच सुसंस्कारांचे आणि नितीमत्तेचे धडे देतात व त्यांची मुले देखील त्याचे पालन करुन, आपल्या आचरणातून समाजात एक आदर्श प्रस्थापित करतात” अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

आई- वडिलांचा झालेला हा सन्मान आमच्या जीवनातील अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होय. हा पुरस्कार म्हणजे आमच्या कुटुंबाचा सर्वोच्च सन्मान असल्याची भावना श्री. निलेश यांनी याप्रसंगी व्यक्त केली.